तळोजा औद्योगिक क्षेत्रात वायुच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचे लोकायुक्तांचे आदेश





पनवेल दि.२४ (वार्ताहर) : तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांकडून हवेत सोडल्या जाणाऱ्या वायुच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करुन तीन आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोक आयुक्त व्ही. एम. कानडे यांनी शासनाच्या पर्यावरण विभागाला दिले. याप्रसंगी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, राज्य पर्यावरण विभागाचे अधिकारी, आदर्श सामाजिक संस्थेचे राजीव सिन्हा, अंकुश गायकवाड, सुनील पाटील तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.



तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्रवासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार तळोजा मधील आदर्श सामाजिक संस्थेने मुंबई लोक आयुक्तांकडे केली होती. प्रथम सुनावणी वेळी लोक आयुक्तांनी केमिकलच्या उग्र वासामुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या समस्यांविषयी लेखी माहिती राज्य सरकार आणि लोक आयुक्त कार्यालयात सादर करण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबईतील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळच्या अधिकाऱ्यांनी पथकासमवेत औद्योगिक क्षेत्रात केलेल्या पाहणीत केमिकलयुक्त उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. 



तर पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या कार्यालयाकडून निर्माण करण्यात आलेल्या पथकाने पाहणी केली असता तळोजा औद्योगिक परिसर आणि जवळपासची गावे आणि वसाहतीमध्ये केलेल्या पाहणीत उग्र वास येत असल्याचा अहवाल सादर केला होता. यासंदर्भात पनवेल तहसील कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर लोक आयुक्त कानडे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला आणि तळोजा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या कंपनीतून हानीकारक वायू आणि घातक वायू सोडले जात आहेत, ते शोधून काढण्याचे निर्देश दिले. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळने प्रदुषण तसेच जल आणि हवेची गुणवत्ता मोजमाप करणारे मीटर किंवा तांत्रिक उपकरणे बसवावीत अशी सूचना केली.



थोडे नवीन जरा जुने