आणि दिबांच्या नावाचे फलक झळकले






आणि दिबांच्या नावाचे फलक झळकले 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' नामफलकाचे अनावरण 

पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने आज (बुधवार, ०९ ऑगस्ट) नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावून सरकारला इशारा दिला असल्याचे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले


                      नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. त्याबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तरघर, उलवे व चिंचपाडा या तीन प्रमुख मार्गांवर ' लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ' असे नामफलक लावण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार सल्लागार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कोंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, रत्नप्रभा घरत, जे. डी. तांडेल, अतुल पाटील, गुलाब वझे, संतोष केणे, विनोद म्हात्रे, गजानन पाटील, राजेश गायकर, विजय गायकर, दीपक पाटील, संजय भगत, प्रताप पाटील, नितेश वैती, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र वाडकर, पनवेलचे माजी नगरसेविका, नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



      सकाळी प्रथम तरघर येथे नंतर उलवे व चिंचपाडा येथे नामफलक लावण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी राज्य सरकारचा या नावाला विरोध नाही . त्यामुळे दोन्ही विधिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी लवकर पाठवावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांना पाठपुरावा करण्याची जवाबदारी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच त्याला मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच आज क्रांती दिन आहे. तुम्ही फार वेळ घेऊ नका अन्यथा आम्हाला क्रांति करावी लागेल. ११ ऑक्टोबर जयप्रकाश जयंतीला आम्ही मंत्रालयावर लॉग मार्च काढू असा इशाराही देण्यात आला. 


   
  
थोडे नवीन जरा जुने