वडाळे तलावात संरक्षक जाळी बसवण्याची मनसेची मागणी






वडाळे तलावात संरक्षक जाळी बसवण्याची मनसेची मागणी 
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेलच्या वडाळे तलावात लहान मुले व विद्यार्थी वर्ग पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचदा आपले सुरक्षा रक्षक यांचे लक्ष चुकवून विद्यार्थी व लहान मुले पाण्याच्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडू नये म्हणून सदर ठिकाणी संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसे पनवेल विभाग अध्यक्ष संदिप कृष्णा पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. 



              या निवेदनात संदिप पाटील यांनी म्हटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेने पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम वडाळे तलाव सुशोभिकरणाच्या माध्यमातून केले आहे. या तलावाच्या परिसरात सध्या सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमते. तसेच या परिसरात शाळा देखील असल्याने विद्यार्थी वर्ग या ठिकाणी वावरत असतो. 



आपण, तलावाचे पाणी चारही बाजुने भिंत बांधून बंदिस्त केले आहे. परंतु, ज्या ठिकाणी पालिकेने पार्कींग तसेच फुडमॉलसाठी जागा मोकळी ठेवली आहे. त्या ठिकाणी तलावाला लागून पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी लहान मुले व विद्यार्थी वर्ग पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचदा आपले सुरक्षा रक्षक यांचे लक्ष चुकवून विद्यार्थी व लहान मुले पाण्याच्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.


 आपण, पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा जो रोवला आहे त्याला या दुर्घटनेमुळे गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सदर ठिकाणी संरक्षक जाळी बसवून दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे. यावेळी मनसे पनवेल विभाग अध्यक्ष (प्रभाग क्र.१९) संदिप कृष्णा पाटील, शाखा अध्यक्ष गणेश गायकर, सचिन सिलकर, आकाश घाटे, शुभम म्हात्रे आदी उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने