तरुणांनी देखील व्यवसायिकतेकडे वळण्याची गरज- सलीम रेहमानी, फैसल रुफिंग सोल्युशन







तरुणांनी देखील व्यवसायिकतेकडे वळण्याची गरज- सलीम रेहमानी, फैसल रुफिंग सोल्युशन
पनवेल दि.०१(संजय कदम): 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तळोजा एमआयडीसीमध्ये भारतीय बांधकामउद्योग ,संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन फैसल रुफिंग सोल्युशनच्या वतीने आज करण्यात आले होते. 



उद्योग व्यावसायिकांशीसंवाद साधण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या या चर्चा सत्रात सलीम रेहमानी यांनी कंपनीचे यश कोणत्याही एका व्यक्तीमुळे कधीच होत नाही, टीमच्या बळावरच यश मिळू शकते त्यामुळे तुम्ही कामगाराला आपलेसे करून काम केले पाहिजे तसेच आजच्या पिढीने सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योगधंद्यात करावा असे आवाहन केले.


फैसल रूफींग सर्व्हिसेस कंपनीला 32 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल कंपनीच्या कामगारांसह उद्योजकांना एकत्र येवून मार्गदर्शनपर चर्चां सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला आयएमसीचे माजी अध्यक्ष राकेश कुमार, फैसल रुफिंग सोल्युशनचे सलीम रेहमानी, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आदींसह मोठ्या उद्योजक,कामगार यावेळी संख्येने उपस्थित होते. यावेळी सलीम रेहमानी यांनी आपला जीवन प्रवासाची माहिती उपस्थितांना दिली. एक सर्वसामान्य मजूर देखील मोठ्या कंपनीचा मालक होऊ शकतो. याकरिता जिद्द, चिकाटी महत्वाची असल्याचे सांगत तरुणांनी देखील व्यवसायिकतेकडे वळण्याची गरज असल्याचे रेहमानी यांनी यावेळी सांगितले. तर उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी कामगार कारखान्याचा पाया असतो, कामगाराला अधिकार देवून काम करण्याची मुभा दिली तरच तो उद्योग यशस्वी होतो, नवे उद्योजक तयार करतो असे मत व्यक्त केले. या चर्चासत्रात उद्योजक घडविण्याचा संकल्प करण्यात आला. उद्योग यशस्वी करण्यासाठी कामगाराला मालक म्हणून कंपनीत काम करावेसे वाटले पाहिजे. 


कंपनीत कामगार समाधानी असेल तर कोणताही उद्योग मागे येवू शकणार नाही. कंपनीचे यश कोणत्याही एका व्यक्तीमुळे कधीच होत नाही, टीमच्या बळावरच यश मिळू शकते त्यामुळे तुम्ही कामगाराला आपलेसे करून काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कंपनीने कमी व्यवसाय केला तरी, व्यवसायात सातत्य असले पाहिजे. आपण व्यवसाय अथवा कोणताही काम करत असताना आपल्या धर्मासोबत राष्ट्रप्रेम देखील महत्वाची असल्याचे सलीम रेहमानी यांनी सांगितले. आजही आमच्या कारखान्याच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होते. हे आमच्या मनातील राष्ट्रप्रेम असुन प्रत्येकाचे आपल्या भूमीवर प्रेम असलेच पाहिजे त्या शिवाय आपल्या देशाची प्रगती होऊ शकणार नाही असेही सलीम रेहमानी रेहमान यांनी सांगितले.



थोडे नवीन जरा जुने