पनवेल दि . २० ( वार्ताहर ) : कळंबोळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांकडून आणखीन एक जिवंत बॉम्ब ही हस्तगत करण्यात आला आहे. या बॉम्बमध्ये अमोनिया नायट्रेट आणि जिलेटीनचा वापर करण्यात आला होता. या बॉम्बचा वापर बिल्डरला धमकावून दोन कोटींची खंडणी मागण्यासाठी करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांकडून त्यावेळी सांगण्यात आलं आहे.
17 जूनला सुधागड हायस्कुलच्या जवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. पुणे येथे राहणारा सुशिल साठे तर नवी मुंबईतील उलवे येथे राहणारे मनीष भगत आणि दीपक दांडेकर या तिघांनी हा बॉम्ब तयार केला होता.पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला असल्याने मोठी दुर्घटना टळली होती. याची दखल घेऊन तत्कालीन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपरे यांनी त्यावेळी केलेल्या कामगिरीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी उत्कृष्ट कामगिरी म्हणून पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने त्यांना शाल,पुषगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, सार्थक न्यूजचे संपादक नितीन जोशी, सदस्य निखिल गुंदेच्छा, फ्लाविया अहिरवार यांच्यासह वकील वर्ग उपस्थित होता.
Tags
कळंबोली