विमानतळ प्रकल्प बाधित गावांची ओळख कायम ठेवावी - समीर केणी





पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील जी गावे विमानतळ प्रकल्पासाठी बाधित झाली आहेत. त्यांना सिडकोने भूखंड देऊन त्यांचे विस्थापन केले. त्या भूखंडाना सिडकोने वडघर पुष्पक नोड , पुष्पक नगर , आर१ , आर २ आर  ३, आर ४, आर ५ अशा प्रकारची नावे दिली. त्यामुळे गावांची ओळख पुसली गेली. ती ओळख सिडकोने गावांची जुनी नावे आहेत तीच नावे देऊन कायम ठेवावी अशी मागणी भाजपचे वडघर पंचायत समिती विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी केली आहे. 



सिडकोने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवे सारख्या भागातील जमिनी संपादित केल्या. जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून २२. ५ टक्के प्रमाणे भूखंड  देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित झाली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडवर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. काही ठिकाणी चिंचपाडा वासीय ग्रामस्थ एका ठिकाणी , काही ठिकाणी  कोल्ही कोपर येथील तर काही ठिकाणी वरचे ओवळे ग्रामस्थ एका भागात वसले. त्यांना सिडकोने आर २ , आर ३ , वडघर पुष्पक नोड अशी नावे दिली. पण त्यामुळे या गावांची जुनी ओळख पुसली गेली. चिंचपाडा हे गाव देखील त्यापैकी एक आहे. 




या गावाला देखील वसाहतीमध्ये समाविष्ट व्हावे लागले. ग्रामस्थांनी आपल्या रेशन कार्ड , आधार कार्ड , बँकेचे पासबुक यावरील पत्ता हा जुन्या गावातीलच आहे. कोणी पत्ता विचारला तर तो पत्ता देखील ग्रामस्थांना आता नीट सांगता येत नाही. त्यासाठी शासन दरबारी या नव्याने वसलेल्या वसाहतींना देखील जुन्या गावांचीनावे लावण्यात यावीत अशी मागणी नागरिक करीत होत. याबाबत समीर केणी यांनी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्याकडे चर्चा केली असता बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरु केला आहे. २०१७ सालापासून समीर केणी हे याबाबत सिडको अधिकाऱ्यांना विचारणा करत आहे. पण सिडकोचे अधिकारी टोलवा टोलवीचे काम करत असल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. 



नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या विविध समस्याबाबत निवेदन देण्यात आले  असून सदर निवेदनांबाबत सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या अहवालानुसार बैठक घेण्यात आली होती. या  निवेदनामध्ये त्यांनी  आर. १ आर.२.  आर.३ , आर ४, आर ५ क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासंबधीत दस्तऐवज / कागदपत्रावर नामांकरण व फलक उभारून देणेबाबत विनंती केलेली आहे. वरीष्ठ नियोजनकार व मुख्य अभियंता नवी मुंबई यांना  आर.1,  आर.2,  आर.3.,  आर ४ , आर ५  क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे कागदपत्रावर नामांकरण व फलक उभारून देणेबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आपल्या विभागामार्फत करून त्याबाबतचा अहवाल या विभागास सादर करावा  अशी मागणी देखील करण्यात आली आहे. जर सिडकोने याविषयी योग्य ते सहकार्य केले नाही तर आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यास भाग पाडेल असा इशारा भाजपचे समीर केणी यांनी सिडकोला दिला आहे. 


थोडे नवीन जरा जुने