महामार्गालगतच्या दुकानांमुळे अपघातांना निमंत्रण ,




महामार्गालगतच्या दुकानांमुळे अपघातांना निमंत्रण ,
जीवित हानी झाल्यास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
पनवेल / प्रतिनिधी



  पनवेल महानगर पालिका हद्दीतून मुंबई पुणे महामार्ग गेला आहे त्यामुळे महामार्गालगतची जागा पालिका सिडको सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागांकडे असून याचाच फायदा घेत अनेकांनी बेकायदेशीर दुकाने थाटली आहेत , कळंबोली सर्कल ते पळस्पा फाटा दरम्यान अनेक बेकायदेशीर दुकाने रस्त्यालगत थाटली गेली असून हि दुकाने अपघांना निमंत्रण देत आहेत .या दुकानांवर खरेदी करण्यासाठी वाहन चालक आपल्या गाड्या अचानक थांबवत असल्याने आणि खरेदीसाठी रस्त्यात गाड्या उभ्या करीत असल्याने येथे छोटे मोठे अपघात होण्याच्या घटना घडत असून या अपघातात कोणाचा जीव गेल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग , पनवेल महानगर पालिका ,सिडको च्या अधिकाऱ्यांनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे .



कळंबोली सर्कल ते पनवेल बस स्थानक दरम्यान बेकायदेशीर थाटलेल्या दुकानांकडून महापालिका वॉर्ड अधिकाऱ्यांनी काही जण वसुलीसाठी नेमले आहेत त्याचे भाडे मोक्याच्या जागेप्रमाणे हजारो रुपये आहेत तर काही ठिकाणाहून अतिक्रमण पथकाला हप्ता सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे . तसेच भिंगारी ते पळस्पा फाटा दरम्यान अनेक दुकाने रस्त्यालगत लागत असून हि सर्व दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर वसली आहेत. जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि सुमारे पाच हजार ते दहा हजार भाडे काही जण या दुकानदारांकडून दरमहा वसूल करीत आहेत .हे सर्व भाडे वसूल करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी लागेबंध असणारे लोक असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत .


या बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करावी म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी सार्वजनिक विभाग ,पनवेल महानगर पालिका ,सिडको अशा संबंधित ज्यांची हद्द त्यांचेकडे तक्रारी केल्या आहेत मात्र दरमहा लाखो रुपयाचे भाडे अधिकाऱ्यांना मिळत असल्याने ते या दुकानांवर कारवाई करीत नसल्याचे बोलले जात आहे .या दुकानांमुळे अपघात होत असतात मात्र दुकानांवर कारवाई होत नाही अपघात झाल्यास गाडी , अपघात ग्रस्त पीडित आणि पोलीस आसा संबंध येतो मात्र अपघात कशामुळे होतात याच्या मुळाशी कोण जात नसल्याने हि दुकाने रस्त्यालगत थाटली गेली आहेत .या कडे गांभीर्याने लक्ष घालून सदर अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .


  

थोडे नवीन जरा जुने