भाजपतर्फे लोकशाहीचा खून होत असून काँग्रेस नेत्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. - किरीट पाटील.







 उरण दि. 1 (विठ्ठल ममताबादे )देशात भाजपने, केंद्र शासनाने अराजकता माजविली आहे.देशात महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत त्यावर भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. मात्र नको ते कारणे दाखवून काँग्रेस पक्षाचे नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या हुकुमशाही, स्वार्थी वृत्तीचा जाहिर निषेध करतो.भाजपतर्फे लोकशाहीचा खून होत असून आम्ही काँग्रेस नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही असे परखड मत पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते तथा इंटकचे रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील यांनी व्यक्त केले.





देशात सध्या सुरू असलेले राजकीय घडामोडी व त्याबाबत काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवावेत यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध योजना, उपक्रम कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी उरण तालुका कॉंग्रेस व उरण शहर काँग्रेस तर्फे शनिवार दि 1 एप्रिल 2023 रोजी उरण शहरातील गणपती चौकात असलेल्या काँग्रेस कार्यालयात सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंटक रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील, तालुका उपाध्यक्ष आशुतोष म्हात्रे, शहर अध्यक्ष अफशा मुकरी, शहर उपाध्यक्ष चंदा मेवाती, शहर उपाध्यक्ष नदाफ अकबर, केगांव अध्यक्ष सदानंद पाटील,मच्छिमार नेते मार्तंड नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी किरीट पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजप व केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांवर गोरगरिबांवर कसे अन्याय करीत आहे याची माहिती दिली.काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना चूकीच्या पद्धतीने अटक करण्यात झाल्याचे सांगत देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष असून पक्षाने गोरगरिबांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. गोरगरिबांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्याला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.काँग्रेस पक्षाला लोकप्रियता मिळाली.या प्रतिसादामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनात द्वेष ठेवून राहुल गांधी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. याचा आम्ही निषेध करतो.लवकरच जनतेशी उत्तम संपर्क साधण्याच्या दृष्टीने व पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार सुरू करण्याच्या अनुषंगाने लवकरच हात से हात जोडो या अभियानाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचे किरीट पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदाच्या निडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉर्नर सभाही घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत किरीट पाटील यांनी दिली.





 यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही भाजप व केंद्र सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. जनतेच्या पैशाची लूट मोदी सरकार करत आहे.विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारकडे नाही ते महत्वाच्या मुद्द्यापासून पळ काढत आहेत. त्यामुळे हे मोदि सरकार हे सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. त्यांचा खरा चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आणण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती विनोद म्हात्रे यांनी दिली. शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांनीही आमचे दैवत देशाचे नेते राहुल गांधी यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. आम्ही या भाजपचा जाहीर निषेध करीत आहोत असे सांगितले. या पत्रकार परिषदेत उरणमधील पत्रकार उपस्थित होते.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना किरीट पाटील , विनोद म्हात्रे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.


थोडे नवीन जरा जुने