खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली






खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
खोपोली( प्रतिनिधी) खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्‍या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली.


 यामध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था मदतकार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.


बुधवारची रात्र इर्शाळवाडीतील रहिवाशांसाठी काळरात्र ठरली. रात्री 11.30च्या सुमारास डोंगराच्या वरच्या बाजूने मोठा आवाज झाल्याने गावातील मंदिरात असलेल्या तरुणांनी तत्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आवाज ऐकला ते गावाच्या बाहेर आले, पण तोपर्यंत वेगाने मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खाली येऊन अनेक घरांवर पडला होता. ही बाब तरुणांनी खालच्या वाडीवर येऊन सांगितल्यानंतर वार्‍यासारखे हे वृत्त सर्वत्र पसरले. 


शासकीय यंत्रणा, तहसीलदार, पोलीस विभाग, तसेच अपघातग्रस्त मदत टीम, इतर सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, अनिल पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, इतर लोकप्रतिनिधींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यासाठी पाहणी केली व आढावा घेतला.




थोडे नवीन जरा जुने