पुन्हा रिक्षा मीटरचा प्रश्न ऐरणीवर






प्रवाशांची नाहक होणारी लूट आणि रिक्षा चालकांवर होणारे अन्याय याला कारणीभूत असलेल्या सरकारी यंत्रणांना वठणीवर आणण्याकरिता येत्या शनिवारपासून (१५ एप्रिल) सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीींवर बोट ठेवून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.



यासंदर्भात पनवेल उपप्रादेशिक कार्यालयाचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, नवी मुंबई वाहतूक खात्याचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे, महापालिकेचे संबंधित विभागाचे उपायुक्त यांना या संदर्भात जबाबदार धरून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी एका खरमरीत पत्राद्वारे आमरण उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाढत्या पनवेल शहराची प्रवासी वाहतूक सेवा अतिशय विस्कळीत आणि बेशिस्त झाली आहे



. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली रिक्षा प्रवाशांवर सूड उगारत आहे. त्यांची लुट केली जात आहे. सरकारी आदेश, नियम धाब्यावर बसवून अवास्तव भाडे आकारले जात आहे. अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. बोगस रिक्षा चालकांचा प्रश्न गंभीर बनला आहे, सर्व खासगी प्रवासी वाहतूक सेवा नियमाचे उल्लंघन करीत असताना वाहतूक पोलिसांचे अन्यायी मोबाईल फक्त मोटरसायकल चालकांच्या मौकांडी बसत आहेत. एसटी स्टँडपासून दोनशे मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक केंद्र उभारून सान्या यंत्रणांची लाज काढत असताना वाहतूक व आरटीओ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कडू यांनी दिला आहे.



पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर भारत पाकिस्तान युद्धाची दररोज रंगीत तालीम प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये बघायला मिळत असताना तिथे ना पनवेल महापालिका प्रशासन हस्तक्षेप करत, ना आरटीओ किंवा वाहतूक खाते. त्यामुळे आता निर्धार पक्का करुन गेल्या वर्षभरातील तिन्ही आस्थापनांची कारवाई, मोहीम अतिशय तकलादू असल्याचे उघड झाल्याने कडू यांनी प्राणाची बाजी पणाला लावून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे संविधानवादी शस्त्रे उपजली आहेत.


थोडे नवीन जरा जुने