पनवेल शहरातील तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून ‘आनंदाच्या शिधा’ वाटपाचा शुभारंभ






पनवेल शहरातील तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून ‘आनंदाच्या शिधा’ वाटपाचा शुभारंभ  
पनवेल दि.११ (संजय कदम) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आज पनवेल शहरातील तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात आले. 


                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका धारकांना केवळ १०० रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानात त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते आनंदाची शिधा वाटपास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत पनवेल शहरातील तक्का येथील प्रतीक देवचंद बहिरा यांच्या रास्त भाव धान्य व किरकोळ रॉकेल विक्रेते दुकानातून भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते वाटपास सुरुवात करण्यात आली. 



यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक देवचंद बहिरा, दुकानाचे प्रोप्रायटर प्रतीक बहिरा, पत्रकार संजय कदम, रघुनाथ बहिरा, अण्णा भगत, बबन कांबळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पगडे यांनी सांगितले कि, तक्का परिसरातील ९०० हुन अधिक लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. यानिमीत्त मी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व शिधावाटप मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानतो. 



कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक गरीब लोकांना नागरिकांना पैशाची व प्रपंचाची कसा चालवायचं हा प्रश्न उभा होता. पण शासनाच्या माध्यमातून या नागरिकांना एक आधार देण्याचे काम माध्यमातून होत असल्याचे सांगितले तसेच सर्व नागरिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने