थोरात दाम्पत्य लाखो रुपयाचे दागिने घेेवून झाले पसार






थोरात दाम्पत्य लाखो रुपयाचे दागिने घेेवून झाले पसार 
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः खांदा कॉलनी, सेक्टर-9 भागात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे श्री महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान चालविणर्‍या दाम्पत्याने त्याच भागातील अनेक व्यक्तींनी त्यांच्याकडे गहाण ठेवलेले आणि नवीन दागिने बनविण्यासाठी दिलेले लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे. सदाशिव थोरात आणि वैशाली थोरात असे या दाम्पत्याचे नाव असून खांदेश्‍वर पोलिसांनी या दाम्पत्यात विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.







या प्रकरणातील आरोपी थोरात दाम्पत्याने मागील तीन-चार वर्षापूर्वी खांदा कॉलनी, सेक्टर- 9 मधील सत्यम को.ऑप. सोसायटीमध्ये श्री महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान सुरु केले होते. या ज्वेलर्समध्ये दर महिन्याला पैसे जमा केल्यास वर्षाकाठी जेवढी रक्कम जमा होईल तेवढ्या रक्कमेचा सोन्याचा दागिना बनवून देण्यात येत असल्याचे थोरात दाम्पत्याने जाहिर केले होते. त्यामुळे सदर भागातील अनेकांनी या ज्वेलर्समध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. खांदा कॉलनीत राहणारे सुभाष तांबे यांनी थोरात याच्याकडे 41 ग्रॅम वजनाचे दागिने गहाण ठेवून 98 हजार रुपये घेतले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये तांबे आपले दागिने सोडविण्यासाठी गेल्यानंतर थोरात यांनी तांबे यांना 1 लाख 57 हजार रुपये देण्यास सांगितले. 











त्यामुळे तांबे यांनी थोरात यांना 1 लाख 30 हजार रुपये देऊन उर्वरीत 27 हजार रुपये काही दिवसानंतर देण्याचे आश्‍वासन देऊन आपले दागिने परत मागितले. मात्र, थोरात दाम्पत्याने सर्व ग्राहकांचे सोने बँकेत ठेवल्याचे आणि 35 लाख रुपये जमा केल्यानंतर सर्व सोने एकत्र सोडवून आणणार असल्याचे सांगून तांबे यांचे दागिने परत देण्यासाठी 8 ते 10 दिवसांची मुदत मागून घेतली. त्यानंतर देखील थोरात दाम्पत्याने तेच कारण सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे तांबे यांनी थोरात दाम्पत्याला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचे दागिने परत देण्याचे आश्‍वासन थोरात दाम्पत्याने दिले. त्यानंतर थोरात दाम्पत्याने त्याच रात्री आपल्या दुकानाला टाळे ठोवून पलायन केले.






दुसर्‍या दिवशी तांबे ज्वेलर्सच्या दुकानावर गेले असता, दुकान बंद असल्याचे आणि थोरात दाम्पत्याचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. थोरात दाम्पत्याने तांबे यांच्या ओळखीचे सदाशिव कदम यांचे देखील 2 लाख 13 हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पलायन केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर तांबे यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. 



थोडे नवीन जरा जुने