कळंबोलीत राष्ट्रवादी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा





कळंबोलीत राष्ट्रवादी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा
स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा ; नैना प्रश्‍नासंदर्भात आम्ही स्थानिक लोकांबरोबरच ः शरद पवार
पनवेल, दि.16 (4kNews) ः स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रासह राज्य शासनाला करून येथील नैना प्रश्‍ना प्रकरणी आगामी अधिवेशनानंतर राज्य शासनासोबत बैठक घेवून हा नैना प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी स्थानिकांची भूमिका महत्वाची असणार आहे व आम्ही त्यांच्या बरोबर कायमच राहू असा ठाम विश्‍वास आज कळंबोली येथील राष्ट्रवादी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.


कळंबोलीतील श्रीमती शामल मोहन पाटील विद्यालयाच्या प्रांगणात या मेळाव्याचेे आयोजन करण्यात आले होेते. या स्वाभिमानी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ,खासदार डॉ.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, डॉ.कमलकिशोर कदम, युवक प्रांताध्यक्ष मेहबुब शेख, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, राष्ट्रीय सरचिटणीस नसिम सिद्दीकी, प्रभाकर देशमुख, आयोजक व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, प्रशांत पाटील, महिला आघाडीच्या भावना घाणेेकर, प्रदेश समिती सदस्य सुरदास गोवारी, जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, दौलत शिंदे, प्रमोद बागल, अ‍ॅड.तुषार पाटील, प्रमोद यादव, माधवी जोशी, नरेश जोशी, शहाबाज पटेल, शैलेश पाटील, तुषार पाटील, सनी पाटील आदींसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 



यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांंगितले की, या भागातील विकास करताना सिडको तसेच साडेबारा टक्क्याचा प्रश्‍न त्याचप्रमाणे माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्याचे काम आम्हीच सत्तेत असताना केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्र व परिसरातील माथाडी बांधव येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही असते. काही भांडवलदार स्वतःच्या फायद्यासाठी या सरकारमध्ये असून मुंबईतील अनेक उद्योेग गुजरात, सुरत येथे नेण्याचे काम सुरू आहे. यासाठी आता एकजुटीने यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. 
तर यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवारांवर टिका करणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असून आजच्या भाजपच्या बैठकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी फक्त शरद पवारांवर टिका करण्यामध्येच आपला वेळ घालवला. त्यातही चुकीची टिका करायची, हे काम सध्या त्यांचे सुरू आहे. आज मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ही आमची मागणी आहे. रायगड जिल्हा हा पुन्हा बांधण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, एकसंघाने काम करावे असेही त्यांनी आवाहन केले. 



तर खा.अमोल कोल्हे यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पावनभूूमीत गद्दारांना थारा नाही हा इतिहास आहे, नुकताच कर्जत येथे एका मेळावा पार पडला. या मेळाव्यात येथील नेत्यांनी फक्त शरद पवारांवर टिका केली. काही गद्दार हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम पक्षात राहून करत होते. ते आता पक्षाबाहेर गेले आहेत व ते का बाहेर गेलेत हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. 
तर महिला प्रदेशाध्यक्ष रोेहिणी खडसे यांनी सांगितले की, आता परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे, आता बदल घडवायचा आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील जनतेने केला असल्याचे त्यांनी सांगितले. तर मेहबुब शेख यांनी आपल्या धडाकेबाज भाषणात तटकरे हे कटकरे असून त्यांनी शरद पवारांचे घर फोडण्याचे काम केले आहे. तटकरेंनी फक्त आपले कुटुंब व त्याचा फायदा त्यांनी पाहिला, नेहमीच कार्यकर्त्यांना त्यांनी वार्‍यावर सोडले त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या ईडीमुळे हे सर्व पक्ष सोडून गेले असले तरी प्रामाणिक कार्यकर्ता हा पक्षाच्या बाजूने आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत यांचे पानीपत झाल्याशिवाय राहणार असेही त्यांनी सांगितले.
तर आयोजक व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी कळंबोली वसाहतीमधील माथाडी कामगारांचा प्रश्‍न, नैना प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध व गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्‍न हे सर्व प्रश्‍न फक्त शरद पवार साहेबच सोडवू शकतात असा येथील रहिवाशांचा ठाम विश्‍वास आहे. त्यामुळेच आगामी काळात हे सर्व प्रश्‍न सुटलेले दिसतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी साहेब या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने